कला अकादमीच्या कामात गंभीर त्रुटी; ५० कोटीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

अहवालावर टास्क फोर्सचा सवाल : उपाययोजना करण्यासाठी महिनाभराची मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th January, 09:33 pm
कला अकादमीच्या कामात गंभीर त्रुटी; ५० कोटीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

पणजी : कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या कला अकादमीच्या कामात अनेक गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. आयआयटी चेन्नईने केलेल्या पाहणीत इमारतीला गळती आणि भेगा असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर, आयआयटीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करावी आणि अंतिम अहवाल लवकर सादर करावा, अशी मागणी कला अकादमीच्या टास्क फोर्सने केली.

आयआयटी चेन्नईकडून गंभीर त्रुटींवर शिक्कामोर्तब

गुरुवारी ईएसजीमध्ये याविषयी टास्क फोर्सची बैठक झाली. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य विजय केंक्रे, फ्रॅन्सिस कुएलो, देवीदास आमोणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते. फ्रॅन्सिस कुएलो यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात आयआयटी चेन्नईने येथील केवळ ‘व्हिज्युअल’ (प्राथमिक) पद्धतीची पाहणी केली. त्यात त्यांना छताची गळती, जमिनीखालून पाणी येणे आणि बांधकामाला भेगा पडणे अशा अनेक त्रुटी आढळल्या.

आयआयटीने सुचवलेल्या तांत्रिक उपाययोजना

समस्या / तपासणी सुचवलेला उपाय / पद्धत
भेगांची तपासणी इन्फ्रारेड स्कॅनिंग (Infrared Scanning)
धातूंची झीज तपासणे थर्मल स्कॅनिंग (Thermal Scanning)
छताची गळती फोमिंग करणे किंवा स्लॅब पुन्हा बांधणे
समुद्राच्या पाण्याचा शिरकाव कोटिंग जेल (Coating Gel) लावणे

५० कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

नूतनीकरणावर ५० कोटी रुपये खर्च झाले, तरी समस्या कायम आहेत. मग हे काम म्हणजे केवळ ‘चुना लावण्याचा’ प्रकार आहे का, असा सवाल देवीदास आमोणकर यांनी केला. आयआयटीच्या अहवालानुसार काम योग्य झाले नसेल, तर या खर्चाला जबाबदार कोण, याचे उत्तर मिळाले पाहिजे. कामाची प्रक्रिया आणि शिफारशींबाबत आम्ही १८ प्रश्न उपस्थित केले होते, मात्र त्याला अद्याप उत्तर मिळाले नाही, असे आमोणकर यांनी सांगितले.

सुरक्षिततेची हमी कोण देणार?

कला अकादमीमध्ये पुन्हा कार्यक्रम सुरू झाले आहेत. मात्र, इमारत सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र कोणी दिले, हे अद्याप स्पष्ट नाही. उद्या येथे काही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची, हे स्पष्ट करण्याची मागणी आम्ही बैठकीत केली, असे टास्क फोर्सने सांगितले. पुढील ५० वर्षे इमारतीला काही होणार नाही, अशा दर्जाचे काम अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

#KalaAcademy #GoaNews #IITChennai #InfrastructureFail #PanajiNews