जनजीवन विस्कळीत : मान्सून हंगामात राज्यात १५ इंचांपेक्षा अधिक पावसाची नोंद
मुसळधार पावसामुळे कुचेली-म्हापसा येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वार. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मान्सूनच्या पावसाने रविवारी दिवसभर राज्यातील सर्वच भागांना व्यापून टाकले. दिवसभर सुरू राहिलेल्या पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहील, असा अंदाज वर्तवत हवामान विभागाने दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यानंतरचे चार दिवस पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज वर्तवून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मान्सूनपूर्व हंगामात यंदा राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. १ मार्च ते ३१ मे या दरम्यान गतवर्षी सरासरी ४.६४ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र त्यात पाचपटींहून अधिक वाढ झाली. यंदा या काळात राज्यात तब्बल २६.८ इंच इतका पाऊस पडला. राज्यात यावेळी २५ मे रोजीच मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर काही दिवस पावसाने पाठ फिरवली होती. पण, रविवारी दिवसभर राज्यातील सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. १ ते १५ जून या काळात १५.१९ इंच पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीच्या ६.७ टक्के इतका अधिक असल्याची माहिती राज्य हवामान खात्याने दिली.
रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागांमधील सखल भागांत पाणी साचून त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागला. पर्वरीत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे आणि रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागली. मडगाव परिसरात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. झाडे वाहनांवर पडून काही वाहनांचे नुकसान झाले. इतर भागांतही अशाप्रकारच्या घटनांची नोंद झाली असून, अग्निशामक दलाच्या जवानांकडून अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याने पुराची शक्यता वर्तवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.