गोव्यात वाढत्या तापमानामुळे डायरिया, उष्माघाताचा धोका

जैवविविधता मंडळाचा इशारा : प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd November, 10:26 pm
गोव्यात वाढत्या तापमानामुळे डायरिया, उष्माघाताचा धोका

पणजी : गोव्यात सातत्याने वाढणारे तापमान आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता यामुळे भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. विशेषतः डायरिया आणि उष्माघातासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असून, प्रदूषण रोखण्यात अपयश आल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, असा गंभीर इशारा गोवा जैवविविधता मंडळाने आपल्या अहवालात दिला आहे.

गोवा जैवविविधता कृती आराखड्याचा भाग म्हणून डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी हे विश्लेषण केले आहे. त्यांनी ‘संसर्गजन्य आजार, जैवविविधता आणि प्राणीजन्य संसर्ग’ या विषयावर मांडलेल्या माहितीनुसार, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, केएफडी (मंकी फिव्हर), इन्फ्लुएंझा, कोविड-१९ आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारखे आजार थेट हवामान आणि पर्यावरणातील बदलांशी संबंधित आहेत. आरोग्य सेवेच्या ‘एकात्मिक आजार निरीक्षण उपक्रमा’अंतर्गत (आयडीएसपी) या आजारांवर सतत देखरेख ठेवली जात आहे.

तिहेरी धोका : अहवालातील प्रमुख निरीक्षणे

१. वाढते तापमान
तापमानात अचानक आणि तीव्र वाढ झाल्यास ‘उष्माघाताचा’ (Heatstroke) मोठा धोका संभवतो.
२. पाण्याची कमतरता
शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे आणि उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे ‘डायरिया’चा प्रादुर्भाव वाढू शकतो.
३. वायू प्रदूषण
प्रदूषण नियंत्रणात न राहिल्यास ‘श्वसनविकारांच्या’ (Respiratory Issues) रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
उपाययोजना आणि शिफारसी:
  • जैव-कचऱ्याचे (Bio-waste) योग्य व्यवस्थापन करणे.
  • जनावरांच्या मलमूत्राची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावणे.
  • विविध सरकारी खाती आणि आरोग्य संस्थांमध्ये समन्वय वाढवणे.
  • लोकांमध्ये जागृती करून जुन्या उपक्रमांना बळकटी देणे.
#Goa #HealthWarning #ClimateChange #Pollution #GoaBiodiversityBoard #PublicHealth
हेही वाचा