भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; तीन जहाजांना घेतले ताब्यात.

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय तटरक्षक दलाने (ICG) अरबी समुद्रात एक धाडसी मोहीम राबवून आंतरराष्ट्रीय तेल तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडीकेटचा पर्दाफाश केला आहे. काल शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झालेल्या या मोहिमेत तटरक्षक दलाने समुद्र आणि हवेतून पाळत ठेवत तीन संशयास्पद जहाजे ताब्यात घेतली. ही जहाजे युद्धग्रस्त देशांमधून स्वस्त दरात कच्च्या तेलाची तस्करी करून आंतरराष्ट्रीय समुद्रात त्याची विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईपासून पश्चिमेला साधारण १०० सागरी मैल अंतरावर ५ फेब्रुवारी रोजी या जहाजांना रोखण्यात आले. तटरक्षक दलाच्या तांत्रिक यंत्रणेने भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) एका ऑईल टँकरची संशयास्पद हालचाल टिपली होती. त्यानंतर डिजिटल तपास आणि डेटा विश्लेषणाच्या आधारे आणखी दोन संशयास्पद जहाजांची ओळख पटवण्यात आली. ही टोळी समुद्रातच एका जहाजातून दुसऱ्या जहाजात तेलाचे हस्तांतरण करून भारत आणि इतर किनारपट्टीवरील देशांचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत होती.
तटरक्षक दलाच्या तज्ज्ञ पथकाने जहाजांवर चढून तपासणी केली असता, जहाजांवरील इलेक्ट्रॉनिक डेटा आणि कागदपत्रांमध्ये मोठी फेरफार आढळून आली. ही जहाजे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी वारंवार आपली ओळख बदलत असत. प्राथमिक तपासात या जहाजांचे मालक परदेशातील असून, जगभरातील विविध देशांमधून या तस्करीचे जाळे चालवले जात असल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेली जहाजे अधिक तपासासाठी मुंबई बंदरात आणली जात असून, पुढील कारवाईसाठी ती सीमाशुल्क (कस्टम्स) आणि इतर अंमलबजावणी संस्थांच्या ताब्यात दिली जातील. भारतीय तटरक्षक दलाच्या या यशस्वी मोहिमेमुळे सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत भारताचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.