सर्वोच्चपदी निवड होवून २४ तासही उलटले नाहीत अन् इस्रायल-अमेरिकेने केला हल्ला..

तेहरान/जेरुसलेम: मध्यपूर्वेतील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला असून इराणने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई हे सुरू असलेल्या युद्धात शत्रूच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती इराणच्या सरकारी टीव्हीने प्रसारित केली आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मुजतबा यांना देशाची धुरा सोपवण्यात आली होती, मात्र पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच ते जखमी झाल्याने इराणमध्ये खळबळ माजली आहे. सरकारी माध्यमांनी त्यांना 'जानबाज' (शत्रूशी लढताना जखमी झालेला योद्धा) असे संबोधले असून, २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या ज्या हल्ल्यात त्यांचे वडील आणि पत्नीचा मृत्यू झाला होता, त्याच प्रकारच्या संघर्षात ते जखमी झाले.

दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, इराणला हे युद्ध नको होते, तर ते देशावर लादले गेले आहे. प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, इराण सध्या 'मजबुर' असून आपली सुरक्षा करण्यासाठी लढत आहे. सध्या लष्करी संघर्ष तीव्र असल्याने युद्धविरामासाठी कोणत्याही मध्यस्थीवर चर्चा करणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तुर्कीये, सायप्रस आणि अझरबैजान या देशांवर इराणकडून हल्ले झाल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे.

या युद्धाचा मोठा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून कच्च्या तेलाच्या किमती साडेतीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर २५ टक्क्यांनी वाढून ११६ डॉलर प्रति बॅरलवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जी-७ (G7) देशांच्या अर्थमंत्र्यांची तातडीची बैठक होत असून, वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन तेल साठा खुला करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. युरोपियन युनियननेही गुरुवारी गॅस आणि तेल पुरवठ्याबाबत समन्वय गटाची बैठक बोलावली आहे.

युद्धाच्या भीषणतेचा अंदाज इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून येतो. गेल्या नऊ दिवसांत इराणमध्ये १,२५५ लोकांचा मृत्यू झाला असून १२,००० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विशेषतः एका प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात १६८ मुलांचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. इस्रायलमध्येही इराणी मिसाईल्सच्या हल्ल्यात मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून, इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून इराणमधील 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) च्या लष्करी तळांवर आणि रॉकेट कारखान्यांवर जोरदार एअरस्ट्राईक केले आहेत.

भारतानेही या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत माहिती दिली की, मध्यपूर्वेतील भारतीयांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आतापर्यंत या भागातून सुमारे ६७,००० भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. भारत या संघर्षावर राजनैतिक मार्ग काढण्यासाठी सर्व संबंधित देशांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कतारने इराणवर 'दगा फटका' केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी म्हटले की, राजनैतिक तोडगा काढण्याचे आश्वासन देऊनही इराणने आखाती देशांवर हल्ले केले, ही इराणची मोठी चूक आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल अंशी भीती निर्माण झाली आहे.