समविचारी पक्षांसोबत युतीसाठी काँग्रेस उत्सुक!

माणिकराव ठाकरे : भाजपविरोधात सर्वांनी​ एकत्र येण्याची गरज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 11:23 pm
समविचारी पक्षांसोबत युतीसाठी काँग्रेस उत्सुक!

पणजी : भाजपच्या सरकारमुळे गोव्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यातून भाजपला सत्तेतून हटविणे आवश्यक आहे. भाजपला हरवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पक्षांना आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत. वेळ आल्यावर आरजीपीसह अन्य समविचारी पक्षांसोबत विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची देखील चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. यासाठी आधी सर्वांनी एकत्र यावे लागेल. यानंतर पुढे जावे लागेल, असे मत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
ठाकरे म्हणाले की, कोणत्याही पक्षातील उमेदवारांना, कार्यकर्त्यांना जागा वाटप लवकर झाले पाहिजे असे वाटत असते. जिंकण्याची खात्री असणारे काम देखील सुरू करतात. मात्र शेवटच्या टप्प्यात २० ते २५ टक्के उमेदवारांची जुळवाजुळव करावी लागते. विधानसभा निवडणूक जवळ आली असली तरी सहा सात महिने आधीपासूनच युती झाली असे चित्र मी देशात कुठेच पाहिलेले नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते प्राथमिक स्तरावर चर्चा करत असतात. मात्र अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जातो. भाजप विरोधी पक्षांनी आपण एकत्र येऊन पुढे जायचे आहे, हे आधी नक्की करावे. एखाद्या भागात विरोधी पक्षाचा उमेदवार अधिक चांगला असेल तर त्याबाबत एकत्र बसून चर्चा करता येईल.
ठाकरे म्हणाले, जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही गोवा फॉरवर्ड, आरजीपी सोबत जागा वापराबाबत चर्चा केली होती. गोवा फॉरवर्डसोबत ही चर्चा यशस्वी झाली. मात्र काही कारणास्तव आरजीपी सोबत झाली नाही. आम्ही एकत्र लढलो असतो तर जिल्हा पंचायतीचे निकाल वेगळे दिसले असते. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यांना कसाही करून तो दर्जा टिकवायचा आहे. यासाठीच ते गोव्यामध्ये लढत आहेत. येथे त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना देखील माहिती आहे. तरीही केवळ पक्ष आहे हे दाखवण्यासाठी ते लढत आहेत. त्यांच्या नेत्यांचा गोव्याकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे.
फाेंड्यात भाटीकरच!
फोंडा पोट निवडणुकीत केतन भाटीकर यांचा विजय होईल, अशी आम्हाला खात्री आहे. मुळात रवी नाईक हे काँग्रेस विचारांचे होते. फोंड्यातील जनता देखील भाजप विरोधी विचारांची आहे. सध्या भाजप रवी नाईक यांचे नाव घेऊन लोकांना भावनिक करू पाहत आहे. भाजपला रितेश नाईक यांनाच उमेदवारी द्यायची होती, तर केंद्रीय पातळीवर भाजपच्या दोन उमेदवारांची नावे का पाठवली, याचे उत्तर द्यावे. भाजप आपुलकीचा केवळ दिखावा करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
कोणाच्याही काँग्रेस प्रवेशाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
ठाकरे म्हणाले की, काेणत्याही नेत्याला काँग्रेस पक्षात यायचे असेल तर आधी त्यांनी आपली भूमिका ठरवावी. त्यानंतर काँग्रेस पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट करेल. याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.              

हेही वाचा