बंगालमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी हिंसाचार, तरीही मतदारांचा मोठा उत्साह

कोलकाता: देशातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधील दोन टप्प्यांतील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज १५२ जागांसाठी मतदान होत आहे, तर तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ६२.१८ टक्के आणि तामिळनाडूमध्ये ५६.८१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्या तरी मतदारांचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसून आले.

पश्चिम बंगालमध्ये आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कडक उन्हाचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला असल्यामुळे, मतदारांनी सकाळीच केंद्रावर मोठ्या रांगा लावल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत बंगालमध्ये १८.७६ टक्के मतदान झाले होते. मात्र, मतदानाची प्रक्रिया सुरू होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. बेहरामपुर-मुर्शिदाबाद, मालदा आणि अलीपुरद्वार जिल्ह्यांतील काही बूथवर तांत्रिक अडचणींमुळे मतदानाचा वेग काही काळ मंदावला होता. तरीही दुपारपर्यंत मतदानाचा टक्का ६० च्या वर गेल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठा दावा केला. बंगालमध्ये यावेळी नक्कीच परिवर्तन होईल. मतदानाचा हा मोठा आकडा बदलाचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी काही ठिकाणी निवडणूक एजंटना अटक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे कडक कारवाईची मागणी केली. दरम्यान, बीरभूम आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांत हिंसक घटनांनी निवडणुक प्रक्रियेला गालबोट लागले. बीरभूममध्ये भाजपचे निवडणूक एजंट बिस्वजीत मंडल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, यात ते गंभीर जखमी झाले. तर मुर्शिदाबादमध्ये क्रूड बॉम्बचा हल्ला आणि राजकीय गटांमधील चकमकींमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुर्शिदाबादमधील नौदा भागात आम जनता उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायूं कबीर आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. कबीर यांनी पोलिसांवर लाठीचार्जचा आरोप करत आंदोलन केले, तर निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे. पश्चिम मेदिनीपूर आणि पूर्व मेदिनीपूरमध्ये दोन मतदारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कडक उन्हामुळे रांगेत उभे असताना एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला, तर एका महिला मतदाराचा मतदानानंतर घरी परतताना मृत्यू झाला.

तामिळनाडूमध्ये सत्ताधारी एम.के. स्टालिन यांच्यासमोर आपली सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये सत्ता टिकवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागत आहे. सायंकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा केली जात आहे.